Sunday, July 12, 2009

मोतीबिंदू म्हणजे काय?

उपचार पद्धतीत अत्याधुनिकतेची कास
सकाळ वृत्तसेवा
Friday, April 17th, 2009 AT 10:04 PM
जळगाव - डोळ्याला मनाचा आरसा म्हटले जाते. राग, लोभ, मद, मत्सर सारे काही या डोळ्यांतूनच व्यक्त होत असते. आपल्या या डोळ्यांमुळेच आपण सुंदर सृष्टी पाहू शकतो. मानवी शरीरातील डोळा हे अत्यंत महत्त्वाचे इंद्रिय असून, त्याची योग्य काळजी घेतली जात नाही. असंतुलित आहार आणि सवयींमुळे अलीकडे डोळ्यांचे आजार वाढीस लागले आहेत.
डोळ्यांच्या आजारात वाढ होऊ लागल्याने अकाली म्हणजे मोतीबिंदूसारखे आजार वयाच्या पन्नाशीतच जडू लागले आहेत. हा आजार पूर्वी सत्तरी ओलांडल्यानंतर होत असे. विचित्र सवयी आणि व्यसनाधीनता वाढीस लागल्याने डोळ्यांचे अनेक आजार बळावत आहेत. आहारात पालेभाज्या व फळांचा गरजेपुरताही समावेश होत नाही. परिणामी 30 ते 35 या वयोगटानंतर प्रत्येकालाच डोळ्यांचे आजार जडतात. ते जडू नयेत आपले डोळे कायम निरोगी राहावेत, यासाठी डोळ्यांची आपणच काळजी घ्यायला हवी, असे नेत्रतज्ज्ञांचे मत आहे.
वातावरण बदलाचा परिणाम
डोळे अतिशय नाजूक असतात व त्यावर वातावरणाच्या बदलांचा परिणाम लगेच होतो. त्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. ऋतुचक्र बदलत असताना थंडीकडून उन्हाळ्याकडे जाताना हवामानातील बदलांमुळे काही आजार होतात. त्यात ऍलर्जी, कोरडेपणासारख्या तक्रारी जास्त आढळतात. आता संगणकावर काम करणारे तसेच "कॉन्टॅक्‍ट लेन्स' वापरणारे, उन्हामध्ये सतत काम करणारे लोक लक्ष्य बनू शकतात. त्यामुळे सावधानता बाळगणे हा नेहमीचा योग्य उपाय आहे.
खानदेशात सुविधा
खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबारसारख्या शहरांत एक ते दोन दशकांपूर्वी तज्ज्ञ डॉक्‍टरांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती. त्यामुळे कुठल्याही गंभीर आजारावर उपचारांसाठी रुग्णांना पुणे, मुंबई, नाशिकसारख्या मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागत असे. त्यासाठी रुग्णांना मानसिक, शारीरिक त्रासाबरोबरच आर्थिक झळही सोसावी लागत होती. या तिन्ही शहरांचे भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान लक्षात घेता हळूहळू तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ लागली. त्यामुळे रुग्णांची मोठी सोय होत आहे.
खानदेशातील नेत्र रुग्णालयांत सध्या संगणकीय नेत्रतपासणीसह फेको सर्जरी, फोल्डेबल लेन्स इम्प्लांट, एन-डी याग लेझर ट्रीटमेंट, फंड्‌स फ्लुरेसिन अँजिओग्राफी, ऑटोमॅटिक पेरिमेट्री, रेटिना लेझर ट्रीटमेंट, डायबेटिस रुग्णांसाठी लेझर उपचार- रेटिना सर्जरी, ग्लुकोमा सर्जरी, ऑक्‍युलर ट्रॉमा सर्जरी आदी उपचार केले जातात. तसेच लेसर रूम, पेरिमेट्री रूम आदी सुविधाही उपलब्ध आहेत. अलीकडेच या तिन्ही शहरांतील काही नेत्रतज्ज्ञांकडे अत्याधुनिक ओझील फेको शस्त्रक्रिया केल्या जाऊ लागल्या आहेत. पारंपरिक फेको शस्त्रक्रियेतील काही त्रुटी भरून काढण्यासाठी या तंत्रज्ञानात बरेच संशोधन झाले आहे. ओझील तंत्रज्ञानात सुरक्षितता, परिणामकारकता व शस्त्रक्रियेचा वेग यांचा सुंदर मिलाफ साधला जातो. यामुळे स्थानिक स्तरावरच सर्व सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना पुणे- मुंबईसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज राहिलेली नाही.
मधुमेह, रक्तदाबाचा परिणाम
मधुमेह, रक्तदाब या आजारांमुळे डोळ्यांवरही विपरीत परिणाम होतो, याची अनेकांना माहितीच नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी वर्षभरात एकदा डोळ्यांची तपासणी करायलाच हवी. अशा तपासणीत डोळ्यांमध्ये काही दोष आढळल्यास त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा डोळे कायमचे गमावण्याची भीती असते. तसेच लहान मुलांना खेळताना, तसेच शाळेत विविध साधने हाताळताना डोळ्यांना होणारी इजा, या विषयीही जनजागृतीची गरज आहे.
इतर औषधांचा परिणाम
आजकाल रोजच्या जीवनात हे लक्षात आलेय, की वेगवेगळ्या कारणांसाठी आपण अनेक औषधे घेतो आणि त्या औषधांचा आपल्या डोळ्यांवर कळत-नकळत परिणाम होत असतो. यावर आता संशोधन चालू आहे. कोणतीही स्टेरॉइड्‌स जास्त दिवस घेणे गरजेचे असेल, तर त्या उपचारानंतर निदान एकदा तरी डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवून घ्यायला हवे. डॉक्‍टरांना तुम्ही घेत असलेली औषधांची यादी दाखविणे तितकेच महत्त्वाचे आहे.
उन्हाळ्यात काळजी हवीच
वसंत ऋतूमध्ये आंबा-डाळ, कैरीचे पन्हे पिताना रोज भरपूर पाणी पिणे, उन्हात जाताना डोक्‍यावर टोपी घालणे, डोळ्यांवर गॉगल लावणे अत्यावश्‍यक आहे. घरात लहान मुले असतील व ती सतत डोळ्यांना खाज येते, पाणी येते, डोळे लाल होतात, अशा तक्रारी करत असतील, तर त्यांना त्वरित जवळच्या डोळ्यांच्या डॉक्‍टरांना दाखवून घ्या. त्यामुळेच उन्हाळ्याची सुटी आपण चांगली घालवू शकतो. आपला आहार-विहार आणि विचार या सर्वांनीच आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवू या आणि उन्हाळ्यापासून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करू या.
मासे खा, मोतीबिंदू टाळा
एका संशोधनानुसार दीर्घायुष्य मिळण्याबरोबरच नेत्रविकार टाळण्यासाठीही मासे महत्त्वाचे आहेत. विशेषतः मोतीबिंदू टाळण्यासाठी, रेटिनाची क्षमता वाढवण्यासाठी मत्स्याहार चांगला असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आठवड्यातून केवळ एकदाच मत्स्याहार करणाऱ्या व्यक्तींमध्ये दृष्टी जाण्याची किंवा रेटिनावर पडदा येण्याची शक्‍यता 40 टक्‍क्‍यांनी कमी असते, तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही शक्‍यता दुप्पट असते. शरीरातील रेटिनाचे प्रमाण जसे कमी होत येईल तशी मोतीबिंदू होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळेच जास्तीत जास्त मासे खाऊन मोतीबिंदूला दूर ठेवणे, हेच जास्त योग्य ठरते.
मोतीबिंदू म्हणजे काय?
डोळ्यातील नैसर्गिक भिंगास आलेला गढूळपणा म्हणजेच मोतीबिंदू. सामान्य डोळ्यात प्रकाशकिरण पारदर्शक भिंगाद्वारे मागील पडद्यावर केंद्रित होतात. उत्तम दृष्टीकरिता नैसर्गिक भिंग (लेन्स) पूर्णतः पारदर्शक असणे आवश्‍यक असते. जेव्हा या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदू झाल्याने कमी होते तेव्हा रुग्णास अंधूक दिसू लागते. मोतीबिंदू अर्थात लेन्सला आलेला गढूळपणा काळानुसार वाढतच जातो व रुग्णास अधिकाधिक अस्पष्ट दिसू लागते. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया खूपच सुकर झाली आहे.

No comments: